Thursday, August 20, 2009

अकरावीच्या शिल्लक जागांचा घोडेबाजार

अकरावी ऑनलाइन प्रवेश फेरीनंतर नामांकित महाविद्यालयांत शिल्लक राहिलेल्या व व्यवस्थापन कोटय़ातील जागांसाठी प्रचंड मागणी वाढली आहे. विज्ञान व वाणिज्य शाखांसाठी तब्बल दीड लाख रूपयांपेक्षाही अधिक देणगी आकारण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली काही दलाल व विद्यार्थी संघटनाही सक्रिय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
तिवारी नावाची एक व्यक्ती विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी दबाव आणत आहे. विविध मंत्री व शिक्षणाधिकाऱ्यांचे नाव सांगून ही व्यक्ती वेगवेगळ्या महाविद्यालयात फिरते. शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचाच या व्यक्तीला वरदहस्त असल्याचा दावा सूत्रांनी केला.
प्रवेश देण्याच्या नावाखाली अनेक दलाल सक्रिय झाल्याचे शिक्षण उपसंचालक वि. ख. वानखेडे यांनीही मान्य केले. तिवारी व त्याच्यासारखे काही दलाल महाविद्यालयात फिरत असतात. आर्थिक गैरव्यवहार करून ते प्रवेश मिळवून देण्याचा खटाटोप करीत असल्याबद्दल आपल्या कानावर आहे. मंत्र्यांची नावे सांगून हे दलाल आमच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक असे प्रकार दरवर्षी खूप मोठय़ा प्रमाणावर चालत होते. परंतु, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे गैरमार्गाने प्रवेश करणे अशक्य झाले आहे. तिसऱ्या प्रवेश फेरीनंतर काही दलालांनी प्रवेश देण्याचे उद्योग सुरू केले आहेत. पण अशा लोकांना कोणतेही सहकार्य करू नये, अशा सक्त सूचना आपण शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना तसेच महाविद्यालयांच्या प्रश्नचार्याना केल्या आहेत. प्रवेश देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या व्यक्तींची माहिती आपल्या कार्यालयात द्यावी, असेही आवाहन वानखेडे यांनी केले आहे.

No comments: