Sunday, June 21, 2009

नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव लाल फितीत

मुंबईतील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून बुधवारी पहिली प्रवेशयादी जाहीर झाली आहे. उर्वरित प्रवेश प्रक्रिया पुढील आठवडय़ात पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापही नवीन महाविद्यालये व वाढीव तुकडय़ांना मंजुरी देण्याचे शहाणपण राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला सुचलेले नाही. प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक हवालदिल झालेले असतानाही उच्च व तंत्र शिक्षण विभाग या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, अशी टीका शैक्षणिक क्षेत्रातून करण्यात येत आहे.
१२ वीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला, तेव्हा उच्च-तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, या घोषणेला १५ दिवस उलटून गेले तरीही अंमलबजावणी झालेली नाही.
त्यामुळे नवीन महाविद्यालये व वाढीव तुकडय़ा कधी सुरू होणार, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. यंदा १२ वीमधून बी.कॉम.चे
९६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये बी.कॉम.साठी सुमारे ७० हजार जागा उपलब्ध आहेत. इतर सेल्फ फायनान्स (स्वयंअर्थसहाय्यित) अभ्यासक्रमांमध्येही बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे १० हजार जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे किमान १० ते १६ हजार विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी नवीन महाविद्यालये व अतिरिक्त तुकडय़ांची गरज आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने डिसेंबर २००८ मध्येच सुमारे २०० प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाकडे पाठविले होते. या प्रस्तावांची पाहणी करून उच्च शिक्षण संचालनालयाने यातील निवडक प्रस्ताव राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला १२ वीचा निकाल जाहीर झाला तेव्हाच पाठविले आहेत. परंतु, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तसेच या खात्याच्या प्रधान सचिवांनी प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही केली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यामध्ये १५ जुलैपर्यंत नवीन महाविद्यालये व वाढीव तुकडय़ांना मान्यता देण्याची तरतूद आहे. परंतु, पदवी अभ्यासक्रमांची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया जूनमध्येच पार पडते. त्यामुळे त्यानंतर नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयांच्या संस्थाचालकांची मोठी पंचाईत होते. परिणामी गेल्या काही वर्षापासून उच्च - तंत्र शिक्षण विभागाने पाडलेला हा पायंडा आता बदलायला हवा, अशी मागणी संस्थाचालक तसेच विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

मराठी ‘बीएमएम’ची मान्यताही लालफितीत
यंदापासून विविध महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेतील ‘बॅचलर इन मास मीडिया’ (बीएमएम) हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकारांनी पुढाकार घेतला होता. विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील सुमारे १० महाविद्यालयांनी हा अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु, त्याबाबतचे गांभीर्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाला उमजलेलेच नसल्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अद्याप मान्यता मिळालेली नाही. उशिरा मान्यता मिळाली तर या अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत, अशी भीती पत्रकारिता क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

नवीन महाविद्यालयांची घोषणा दोन दिवसांत

नवीन महाविद्यालये तसेच वाढीव तुकडय़ांची येत्या दोन दिवसांत घोषणा करण्यात येणार आहे. आमच्याकडे प्रश्नप्त झालेल्या विविध प्रस्तावांवरच आम्ही सध्या काम करीत आहोत. मराठी बीएमएम अभ्यासक्रमाच्या मान्यतेची प्रक्रियाही लवकरच पार पडेल. -