Friday, September 19, 2008

महिला आयआयटीसाठी नकारघंटा


महाराष्ट्रात अमरावती येथे महिलांसाठी स्वतंत्र आयआयटी स्थापन करण्याचा प्रस्ताव जवळपास बारगळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी या महिला आयआयटीच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. दुर्दैवाने केंद्रीय नियोजन आयोगाने महिला आयआयटीच्या स्थापनेसाठी विरोध दर्शविला आहे. खरेतर, आयआयटी, आयआयएम तसेच केंद्रीय विद्यापीठांची महाराष्ट्राला गरज आहे. किंबहूना महाराष्ट्रात चांगले शैक्षणिक वातावरण असल्यामुळे अशा संस्था येथे प्रभावशाली काम करून शकतात. परंतु, अशा केंद्रीय संस्था महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने कमालीची उदासिनता दाखविली आहे. या अगोदरही केंद्रीय संस्था राज्याच्या हातून निसटल्या आहेत. त्याला राज्य सरकारची उदासिनता कारणीभूत आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी १५ आँगस्ट २००७ रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सात आयआयटी, आठ आयआयएम, ३० केंद्रीय विद्यापीठे अशा केंद्रीय संस्था स्थापन करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, तामिळनाडू, कर्नाटक इत्यादी राज्यांनी या संस्थांसाठी केंद्रात जोरदार लाँबिंग केले. उदासिन महाराष्ट्र सरकारने मात्र या संस्था मिळविण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. या संस्था मिळविण्यासाठी डिसेंबर २००७ नंतर राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या. तोपर्यंत इतर राज्यांनी महत्त्वाच्या संस्था पटकावण्यात यश मिळविले होते. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्राला केवळ एक केंद्रीय विद्यापीठ मिळाले. हे विद्यापीठ पुणे येथे सुरू करण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त राज्याला आयआयटी अथवा आयआयएम या संस्थांची गरज असूनही त्या मिळालेल्या नाहीत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी महाराष्ट्रात महिला आयआयटी सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्राचे त्याकडे लक्ष लागून राहिले होते. परंतु, महिला आयआयटी सुरू करण्यासही परवानगी नाकारल्याने तेल गेले तुप गेले हाती धुपाटणे राहिले अशी महाराष्ट्राची स्थिती झाली आहे.

Thursday, September 18, 2008

विद्यापीठांना हवा मोकळा श्वास

विद्यापीठांच्या सध्यस्थितीवर प्रकाश टाकणारा लेख लोकसत्तामध्ये संपादकीय पानावर प्रसिद्ध झाला आहे. हा लेख जरूर वाचा आणि त्याच्यावर आपलेही मत व्यक्त करा, ही विनंती. http://www.loksatta.com/daily/20080918/vishesh.htm

Tuesday, September 16, 2008

एक वर्षाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम


ब्रिटनमधील ऑक्सफर्ड, केंब्रिज, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा जगप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर स्तरावर एक वर्षाचे अभ्यासक्रम (एमए, एमएस्सी, एमकॉम इत्यादी) राबविण्यात येतात. हेच अभ्यासक्रम भारतीय विद्यापीठांमध्ये दोन वर्षांच्या कालावधीमध्ये राबविले जातात. चार-पाच महिन्यांपूर्वी मुंबईच्या नगरपाल इंदू शहानी व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले यांच्या नेतृत्त्वाखाली विविध महाविद्यालयांच्या १३ प्राचार्यांनी ब्रिटनमधील प्रमुख विद्यापीठांना भेट दिली. या भेटीत शिष्टमंडळाला एक वर्षाच्या अभ्यासक्रमाचे इंगीत सापडले. या एक वर्षाच्या अभ्यासक्रमावर शिष्टमंडळ भलतेच भलतेच फिदा झाले. एवढेच नाही तर ब्रिटनवरून परतल्याबरोबर या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठातही आता एक वर्षांच्या कालावधीचे अभ्यासक्रम राबवावेत, असा कुलगुरूंकडे हट्ट धरला. याच हट्टामुळे आता मुंबई विद्यापीठामध्ये एक वर्ष मुदतीचे अकरा अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत असताना मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे कोणालाही कौतुक वाटेल, पण खरी गोम पुढेच आहे. या अभ्यासक्रमाचा दर्जा ब्रिटन, ऑक्सफर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठांना साजेसा असले की नाही, देवजाणे. पण हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाला नक्कीच साजेसा ठरणार आहे. याचे कारण असे की, या प्रस्तावित महत्त्वकांक्षी अभ्यासक्रमांसाठी सव्वा लाख ते पावणेदोन लाख रूपये शुल्क निश्चित केले जाणार आहे. गंमत म्हणजे यातील काही अभ्यासक्रमांची रचना करण्याचे महान कार्य विषयाषाशी संबंधित नसलेल्या तज्ज्ञांनी पार पाडले आहे (उदा. मास कम्युनिकेशन). बरे, या जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी तज्ज्ञ शिक्षक व पायाभूत सुविधा कुठून उपलब्ध करणार, हे अद्याप निश्चित झाले नसले तरी अभ्यासक्रमांना मंजुरी मिळविण्याची लगीनघाई मात्र मुंबई विद्यापीठाने सुरू केली आहे. म्हणूनच एक वर्ष मुदतीच्या अभ्यासक्रमांचा दर्जा ब्रिटन, ऑक्सफर्ड विद्यापीठांप्रमाणे नसला तरी मुंबई विद्यापीठाच्या दर्जाप्रमाणे नक्कीच असेल. आपणाला काय वाटते....

Monday, September 15, 2008

विद्यापीठांची दशा

भारत २०२० सालापर्यंत जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहात आहे. भारतातील तरूण मनुष्यबळाची वाढती संख्या ही आपली सर्वात जमेची जमेची बाजू आहे. पुढील काही वर्षांत भारत हा जगातील सर्वात तरूण देश असेल, असे म्हटले जाते. त्या अनुषंगाने जगात भक्कम स्थान करण्यासाठी आपला देश औद्योगिक, वाणिज्य, परराष्ट्रीय, सुरक्षा, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्यासाठी आसुसलेला आहे. जुनी - बुरसटलेली पद्धत बदलून आधुनिक दृष्टीकोनाचा अंगिकार केला जात आहे. प्रगतीच्या दिशेने झेपावत असताना जुनाट संकल्पना, जुनाट विचार आपल्याला मागे खेचत असतात. गेल्या साठ वर्षांत आपल्या देशात राबविण्यात येत असलेली kविद्यापीठीय शिक्षण व्यवस्थाl ही सुद्धा एक बुरसटलेली पद्धत आहे. विशेषतः राज्यस्तरीय विद्यापीठे ही अत्यंत मागासलेली आहेत. बदलत्या काळानुसार kविद्यापीठीय शिक्षण व्यवस्थेlत महत्त्वाचे बदल करण्यास आपल्याला अपयश आलेले आहे. खरेतर, विद्यापीठ म्हणजे, संलग्न महाविद्यालयांचा कारभार सांभाळणारी एक पर्यवेक्षीय यंत्रणा असा समज पसरला आहे. परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे आणि निकाल लावणे एवढ्यापुरतेच विद्यापीठांचे महत्त्व उरले आहे. विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजघडीला मुंबई व पुणे या विद्यापीठांमध्ये संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या तिनशेपेक्षा जास्त आहे. ही दोन्हीही विद्यापीठे नावाजलेली आहेत. त्यामुळेच या विद्यापीठांच्या पदवीला महत्त्व आहे. मुंबईतील बहुतांशी महाविद्यालयांचा दर्जा इतका खालावलेला आहे की, तेथून बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांना आपल्या संबधित अभ्यासक्रमामध्ये पुरेसे ज्ञानही मिळालेले नसते. पण कारण महाविद्यालयातून जाणाऱया विद्यार्थ्याला मुंबई-पुणे विद्यापीठाची पदवी मिळत असते. त्यामुळेच अनेक संस्थाचालक महाविद्यालये थाटून पैसा वसुलीचा धंदा करीत आहेत. अशा संस्था म्हणजे, विद्यापीठांच्या नावाने धंदा करणारी दुकाने बनली आहेत. बरे, अशा महाविद्यालयांवर वचक ठेवण्याची जबाबदारी विद्यापीठाची असली तरी आपल्या कार्यकक्षेतील तब्बल ३०० महाविद्यालयांच्या कारभारावर अंकुश घालणे प्रशासकीयदृष्टया केवळ अशक्य अाहे.
सध्यस्थितीत विद्यापीठे या शेकडो महाविद्यालयांच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामातच अधिक गढलेली दिसत आहेत. वास्तविक, विद्यापीठांची खरी जबाबदारी संशोधन करणे व उच्च दर्जाचे शैक्षणिक कायक्रम राबविणे ही आहे. पण सध्यस्थितीत या दोन्ही कामांशिवाय विद्यापीठे चालविली जातात. संशोधन हा विद्यापीठांचा आत्मा असतो. पण हा आत्मा विद्यापीठात दिसेनासा झाला आहे. वास्तविक, संलग्न महाविद्यालयांच्या जोखडातून मुक्त झाल्या विद्यापीठे मोकळा श्वास घेणार नाहीत. संलग्न महाविद्यालयांमुळे शैक्षणिक दर्जा कमालीचा ढासळत चालला आहे. आपले शिक्षण हे परीक्षा केंद्रीत बनले आहे. विद्यापीठाने बनविलेल्या अभ्यासक्रमाची बाजारात उपलब्ध आयती पुस्तके विकत आणायची. त्याची घोकंपट्टी करायची आणि परीक्षेच्या दिवशी उत्तरपत्रिका भरून काढायच्या. अशा दर्जाचे शिक्षण आपल्या युवकांना दिले जात आहे. संलग्न महाविद्यालयांतून दिल्या जाणाऱया पदवी अभ्यासक्रमाच्या तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. देशामध्ये सध्या काही केंद्रीय विद्यापीठे तसेच काही उच्च शिक्षण संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये संशोधन व शैक्षणिक कार्यक्रम बऱयापैकी चांगल्या पद्धतीने राबविले जातात. विशेषतः आयआयटीने जगभरात आपला चांगला ठसा उमटवला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठानेही नावलौकीक संपादन केले आहे. इतर विद्यापीठांची मात्र दशा झाली असून त्यांना दिशा सापडण्याची गरज आहे.