Saturday, July 21, 2007

मरिन उद्योगात वर्षाला 50 हजार नोकऱ्यांची संधी

मुंबई : मरीन उद्योगात प्रचंड विकास होत आहे. या क्षेत्रात दरवर्षी तब्बल 50 हजार कुशल मनुष्यबळाची गरज आहे; मात्र दुर्दैवाने आपल्याकडे वर्षाला केवळ पाच हजार कर्मचारीच उपलब्ध होत आहेत. हे प्रमाण वाढणे अत्यावश्‍यक असल्यामुळे देशात किमान पाच विद्यापीठे तातडीने सुरू करण्याची आवश्‍यकता असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी सांगितले.
होत असलेल्या प्रचंड बदलांची आपण दखल घेणे आवश्‍यक आहे. गरजेनुसार कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी मुंबई, गुजरात, कोलकत्ता व चेन्नई या बंदरे असलेल्या भागांमध्ये मरीन विद्यापीठे स्थापन करणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधानांना सादर केलेल्या अहवालात देशात अजून नवी विद्यापीठे स्थापन करण्याचे सुचविले आहे. परदेशात मरीन उद्योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.उद्योगातील कामगारांच्या भरतीसाठी केंद्राच्या शिपिंग खात्याच्या वतीने परीक्षा घेण्यात येतात. त्याऐवजी शिपिंग खात्याने विविध विद्यापीठांना अनुदान देऊन मरीन अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. मुंबई विद्यापीठाला शिपिंग खात्याने अनुदान दिल्यास आम्ही असे अभ्यासक्रम आनंदाने राबवू, असेही डॉ. खोले यांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये (नेरूळ) येथे मरीन अभ्यासक्रम शिकविणारे महाविद्यालय सुरू करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments: