Saturday, July 21, 2007

सर्व शिक्षा अभियानचा दुसरा टप्पा 2011 पासून

मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व शिक्षा अभियानाचा पहिला टप्पा 2010 मध्ये संपत आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला 2011 पासून सुरुवात होईल. त्यामध्ये "दर्जेदार शिक्षणावर' भर दिला जाईल, अशी माहिती नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिली.मुंबईत पत्रकार संघाच्या घेण्यात आलेल्या वार्तालापात ते बोलत होते. सर्व शिक्षा अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न केले जातील. विशेषत: गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांवर अधिक भर दिला जाईल, असे ते म्हणाले. सर्व शिक्षा अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाईल. देशातील काही राज्य सरकारांच्या वतीने चालू केलेल्या शिक्षणसेवक योजनेला त्यांनी विरोध केला. आठ हजार पगार देण्याऐवजी केवळ दोन हजार रुपयांत शिक्षकांना राबविले जाते. ही पद्धत बंद करून नियमित व तज्ज्ञ शिक्षकांच्या नेमणुका करायला हव्यात. त्याबाबतचा आदेश लवकरच केंद्राकडून संबंधित राज्यांना दिला जाण्याची शक्‍यताही त्यांनी बोलून दाखविली. शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर कामे देऊ नका, असेही त्यांनी फर्मावले. कोठारी आयोगाने राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या सहा टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करण्याची शिफारस केली होती; परंतु 45 वर्षांनंतरही केवळ 3.9 टक्के खर्च केला जात आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना "शिक्षण हक्क मसुदा विधेयक 2006' मंजुरीसाठी पाठविले आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.पुढील दहा वर्षांत अजून दहा बोर्ड सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांमुळे एसएससी बोर्डातील विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश घेताना अन्याय होत असल्याचा प्रश्‍न डॉ. मुणगेकर यांना विचारला होता. त्यावर पुढील दहा वर्षांत अजून दहा-बारा बोर्ड अस्तित्वात येतील. त्या वेळी आपण काय करणार आहोत, असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला. आयसीएसई व सीबीएसई बोर्डाच्या शिक्षणाचा दर्जा अत्यंत चांगला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

No comments: