Thursday, September 18, 2008

विद्यापीठांना हवा मोकळा श्वास

विद्यापीठांच्या सध्यस्थितीवर प्रकाश टाकणारा लेख लोकसत्तामध्ये संपादकीय पानावर प्रसिद्ध झाला आहे. हा लेख जरूर वाचा आणि त्याच्यावर आपलेही मत व्यक्त करा, ही विनंती. http://www.loksatta.com/daily/20080918/vishesh.htm

Tuesday, September 16, 2008

एक वर्षाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम


ब्रिटनमधील ऑक्सफर्ड, केंब्रिज, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा जगप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर स्तरावर एक वर्षाचे अभ्यासक्रम (एमए, एमएस्सी, एमकॉम इत्यादी) राबविण्यात येतात. हेच अभ्यासक्रम भारतीय विद्यापीठांमध्ये दोन वर्षांच्या कालावधीमध्ये राबविले जातात. चार-पाच महिन्यांपूर्वी मुंबईच्या नगरपाल इंदू शहानी व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले यांच्या नेतृत्त्वाखाली विविध महाविद्यालयांच्या १३ प्राचार्यांनी ब्रिटनमधील प्रमुख विद्यापीठांना भेट दिली. या भेटीत शिष्टमंडळाला एक वर्षाच्या अभ्यासक्रमाचे इंगीत सापडले. या एक वर्षाच्या अभ्यासक्रमावर शिष्टमंडळ भलतेच भलतेच फिदा झाले. एवढेच नाही तर ब्रिटनवरून परतल्याबरोबर या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठातही आता एक वर्षांच्या कालावधीचे अभ्यासक्रम राबवावेत, असा कुलगुरूंकडे हट्ट धरला. याच हट्टामुळे आता मुंबई विद्यापीठामध्ये एक वर्ष मुदतीचे अकरा अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत असताना मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे कोणालाही कौतुक वाटेल, पण खरी गोम पुढेच आहे. या अभ्यासक्रमाचा दर्जा ब्रिटन, ऑक्सफर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठांना साजेसा असले की नाही, देवजाणे. पण हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाला नक्कीच साजेसा ठरणार आहे. याचे कारण असे की, या प्रस्तावित महत्त्वकांक्षी अभ्यासक्रमांसाठी सव्वा लाख ते पावणेदोन लाख रूपये शुल्क निश्चित केले जाणार आहे. गंमत म्हणजे यातील काही अभ्यासक्रमांची रचना करण्याचे महान कार्य विषयाषाशी संबंधित नसलेल्या तज्ज्ञांनी पार पाडले आहे (उदा. मास कम्युनिकेशन). बरे, या जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी तज्ज्ञ शिक्षक व पायाभूत सुविधा कुठून उपलब्ध करणार, हे अद्याप निश्चित झाले नसले तरी अभ्यासक्रमांना मंजुरी मिळविण्याची लगीनघाई मात्र मुंबई विद्यापीठाने सुरू केली आहे. म्हणूनच एक वर्ष मुदतीच्या अभ्यासक्रमांचा दर्जा ब्रिटन, ऑक्सफर्ड विद्यापीठांप्रमाणे नसला तरी मुंबई विद्यापीठाच्या दर्जाप्रमाणे नक्कीच असेल. आपणाला काय वाटते....

Monday, September 15, 2008

विद्यापीठांची दशा

भारत २०२० सालापर्यंत जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहात आहे. भारतातील तरूण मनुष्यबळाची वाढती संख्या ही आपली सर्वात जमेची जमेची बाजू आहे. पुढील काही वर्षांत भारत हा जगातील सर्वात तरूण देश असेल, असे म्हटले जाते. त्या अनुषंगाने जगात भक्कम स्थान करण्यासाठी आपला देश औद्योगिक, वाणिज्य, परराष्ट्रीय, सुरक्षा, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्यासाठी आसुसलेला आहे. जुनी - बुरसटलेली पद्धत बदलून आधुनिक दृष्टीकोनाचा अंगिकार केला जात आहे. प्रगतीच्या दिशेने झेपावत असताना जुनाट संकल्पना, जुनाट विचार आपल्याला मागे खेचत असतात. गेल्या साठ वर्षांत आपल्या देशात राबविण्यात येत असलेली kविद्यापीठीय शिक्षण व्यवस्थाl ही सुद्धा एक बुरसटलेली पद्धत आहे. विशेषतः राज्यस्तरीय विद्यापीठे ही अत्यंत मागासलेली आहेत. बदलत्या काळानुसार kविद्यापीठीय शिक्षण व्यवस्थेlत महत्त्वाचे बदल करण्यास आपल्याला अपयश आलेले आहे. खरेतर, विद्यापीठ म्हणजे, संलग्न महाविद्यालयांचा कारभार सांभाळणारी एक पर्यवेक्षीय यंत्रणा असा समज पसरला आहे. परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे आणि निकाल लावणे एवढ्यापुरतेच विद्यापीठांचे महत्त्व उरले आहे. विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजघडीला मुंबई व पुणे या विद्यापीठांमध्ये संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या तिनशेपेक्षा जास्त आहे. ही दोन्हीही विद्यापीठे नावाजलेली आहेत. त्यामुळेच या विद्यापीठांच्या पदवीला महत्त्व आहे. मुंबईतील बहुतांशी महाविद्यालयांचा दर्जा इतका खालावलेला आहे की, तेथून बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांना आपल्या संबधित अभ्यासक्रमामध्ये पुरेसे ज्ञानही मिळालेले नसते. पण कारण महाविद्यालयातून जाणाऱया विद्यार्थ्याला मुंबई-पुणे विद्यापीठाची पदवी मिळत असते. त्यामुळेच अनेक संस्थाचालक महाविद्यालये थाटून पैसा वसुलीचा धंदा करीत आहेत. अशा संस्था म्हणजे, विद्यापीठांच्या नावाने धंदा करणारी दुकाने बनली आहेत. बरे, अशा महाविद्यालयांवर वचक ठेवण्याची जबाबदारी विद्यापीठाची असली तरी आपल्या कार्यकक्षेतील तब्बल ३०० महाविद्यालयांच्या कारभारावर अंकुश घालणे प्रशासकीयदृष्टया केवळ अशक्य अाहे.
सध्यस्थितीत विद्यापीठे या शेकडो महाविद्यालयांच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामातच अधिक गढलेली दिसत आहेत. वास्तविक, विद्यापीठांची खरी जबाबदारी संशोधन करणे व उच्च दर्जाचे शैक्षणिक कायक्रम राबविणे ही आहे. पण सध्यस्थितीत या दोन्ही कामांशिवाय विद्यापीठे चालविली जातात. संशोधन हा विद्यापीठांचा आत्मा असतो. पण हा आत्मा विद्यापीठात दिसेनासा झाला आहे. वास्तविक, संलग्न महाविद्यालयांच्या जोखडातून मुक्त झाल्या विद्यापीठे मोकळा श्वास घेणार नाहीत. संलग्न महाविद्यालयांमुळे शैक्षणिक दर्जा कमालीचा ढासळत चालला आहे. आपले शिक्षण हे परीक्षा केंद्रीत बनले आहे. विद्यापीठाने बनविलेल्या अभ्यासक्रमाची बाजारात उपलब्ध आयती पुस्तके विकत आणायची. त्याची घोकंपट्टी करायची आणि परीक्षेच्या दिवशी उत्तरपत्रिका भरून काढायच्या. अशा दर्जाचे शिक्षण आपल्या युवकांना दिले जात आहे. संलग्न महाविद्यालयांतून दिल्या जाणाऱया पदवी अभ्यासक्रमाच्या तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. देशामध्ये सध्या काही केंद्रीय विद्यापीठे तसेच काही उच्च शिक्षण संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये संशोधन व शैक्षणिक कार्यक्रम बऱयापैकी चांगल्या पद्धतीने राबविले जातात. विशेषतः आयआयटीने जगभरात आपला चांगला ठसा उमटवला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठानेही नावलौकीक संपादन केले आहे. इतर विद्यापीठांची मात्र दशा झाली असून त्यांना दिशा सापडण्याची गरज आहे.

Saturday, August 30, 2008

बीएमएमचे वाटोळे

प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये अफाट प्रगती झाली आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी कोणाला भविष्यातही या वाटले नसेल की वृत्तपत्र व वृत्तपत्रवाहिन्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. पण हे झालं आहे खरं. प्रसारमाध्यमांची अफाट संख्या वाढल्यामुळे वाचकांना व दर्शकांना बातम्या, नवनवीन माहिती मिळविण्याचे पर्यायही वाढले आहेत. वाचकांच्या बातम्यांची ही भूख भागविण्यासाठी आता वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या यांना झगडावे लागत आहे. स्पर्धा वाढल्यामुळे प्रसारमाध्यामांनी आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. मिडीया अशा वेगाने फोफावत असतानाच या या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वानवा आहे. त्यामुळे वाचकांना/दर्शकांना दर्जेदार माहिती पुरविताना माध्यमांची दमछाक होत आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी आहेत, ही बाब एव्हाना तरूणांच्याही चांगलीच लक्षात आली आहे. त्यामुळेच प्रसारमाध्यमांबद्दल प्रशिक्षण देणाऱया संस्थांकडे तरूणांचे लोंढे वाढू लागले आहेत. पण दुर्दैव म्हणजे, अशा तरूणांसाठी अद्यापर्यंत चांगला अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात विविध शिक्षण संस्थांना अपयश आले आहे. विद्यार्थ्यांना कोणताही अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची अधिकृत जबाबदारी विद्यापीठांची आहे. मुंबईमध्ये अर्थातच ही जबाबदारी `मुंबई विद्यापीठा'चीच आहे. ही गरज ओळखून (?) मुंबई विद्यापीठाने २००१ साली `बॅचलर इन मास मिडीया' हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला. जवळपास आठ वर्षापासून हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. तरीही त्याची दुर्दशा न वर्णावी अशी झाली आहे. आजघडीला मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सुमारे ४६ महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. पण `एक ना धड भाराभर चिंद्या' अशीच या अभ्यासक्रमाची स्थिती झाली आहे.
या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने स्थापन केलेल्या `बोर्ड ऑफ स्टडीज'मधील पाच सदस्यांपैकी केवळ एक सदस्य प्रसारमाध्यमांशी संबंधित आहे. उर्वरीत चार सदस्यांचा दुरान्वयेही माध्यम क्षेत्राशी संबंध नाही (अरे बापरे). हे चारही सदस्यांनी चक्क `एमए इन इंग्लिश लिटरेचर' हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. प्रसारमाध्यमांतील अनुभव तर दुरच ! असे असतानाही या चार सदस्यांची `बोर्ड ऑफ स्टडीज'मध्ये नेमणुक कशी झाली हे नवलच की !
एवढेच नव्हे तर मुंबईतील जवळपास सर्वच महाविद्यालयांमध्ये बीएमएमसाठी `एमए इन इंग्लिश लिटरेचर' हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. बहुतांशी महाविद्यालयांतील बीएमएमचे विभागप्रमुखही `एमए इन लिटरेचर' हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. प्रसारमाध्यमांचा कसलाही गंध नसताना हे शिक्षक भावी पत्रकार (व जाहीरात क्षेत्रातील तज्ज्ञ) घडवत आहेत. इंटरनेटवरील आयता मजकूर उचलून तो विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचे काम हे शिक्षक करीत आहेत. त्यात विद्यार्थीही `डाऊनलोड तज्ज्ञ' बनले आहेत. दुर्दैवाने महाविद्यालयांनाही याची चिंता नाही. कारण `बीएमएम' म्हणजे महाविद्यालयांसाठी `सोन्याचे अंडे देणारा कोंबडी' ठरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीही शिकविले नाही तरी चालेल आपण मात्र `मनी मेकींगचा' व्यवसाय जोरात चालवायचा असे चित्र दिसत आहे. महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी पुरेसे संगणक उपलब्ध नाहीत. असलेच तर त्यात आधुनिक सॉफ्टवेअर नाही. ग्रंथालयात संदर्भसाहित्य पुरेसे नाही. स्टुडिओ नाही. कॅमेरे नाहीत. असा सगळा आनंदीआनंद आहे.
गंभीर प्रकार म्हणजे, विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमात पत्रकारीता आणि जाहीरात या दोन्ही क्षेत्रांचा एकत्रित समावेश करण्यात आला आहे. मुळातच या दोन्ही क्षेत्रामध्ये करियर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इच्छा, आकांक्षा व गरजांमध्ये जमीन-अस्मानमधील फरक आहे. या दोन्ही क्षेत्रातील मुलभूत फरक लक्षात न घेताही बीएमएममध्ये पहिल्या दोन्ही वर्षांमध्ये एकाच वर्गात बसविले जाते. दोन्ही क्षेत्रांच्या तंगड्यात-तंगडी अडकवून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. म्हणूनच तो कुचकामी ठरला आहे.
याबाबत, गेल्या काही दिवसांमध्ये लोकसत्ता या आघाडीच्या दैनिकात बीएमएमचे वाभाडे काढणाऱया बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पहा जरा -
http://www.loksatta.com/daily/20080826/mv02.htm ,
http://www.loksatta.com/daily/20080827/mv07.htm ,
http://www.loksatta.com/daily/20080828/mv07.htm ,
http://www.loksatta.com/daily/20080829/mv07.htm